निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.
सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.
माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.
वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.